पुणे प्रतिनिधी :
दि. २८ मार्च २०२४
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये बरेच राजकीय पक्ष महाविकास आघाडी आणि महायुतीच्या स्वरूपात एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे
जाणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे एकत्र आहेत, तर दुसरीकडे
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे एकत्रित आहेत.
प्रत्येक मतदारसंघात यापैकी कोणत्यातरी एका पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणात आहे पण त्या उमेदवाराला इतर पक्षातील कार्यकर्ते आणि
नेत्यांशी समन्वय साधण्यात नाकी नऊ येत आहेत. इतर पक्षातील नेते उमेदवाराकडे विविध मागण्या करत आहेत. यातील मुख्य मागणी म्हणजे
विधानसभेच्या उमेदवारीची गॅरंटी! या जागेसाठी शब्द घेऊनच लोकसभेसाठी काम करण्याची भाषा बहुतेकजण करत आहेत. यामुळे अशा
नेत्यांना समजावण्यात वरिष्ठ नेत्यांची आणि उमेदवारांची चांगलीच कसरत होते आहे.
पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा विचार करता, बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचाउमेदवार
उभा राहाणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या उमेदवाराचं काम भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना करायचं आहे. या वेळी या
दोन्ही पक्षांतील नेते विधानसभेचा शब्द अजित पवारांकडून मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी
यापूर्वीच आपलं मत व्यक्त केलं असून, विधानसभेचा शब्द मिळाल्यानंतरच राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या कामाचा विचार करू असं त्यांनी
सांगितलं आहे.
तर दुसरीकडे पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारे यांनादेखील अजित पवारांकडून शब्द हवा आहे. दुसरीकडे महाविकास
आघाडीचा विचार करता महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या लोकसभेच्या मैदानात आहेत. भोर
विधानसभा मतदारसंघांमधून बहुमतासाठी त्या आशावादी आहेत.
मात्र, इथेसुद्धा काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना सुप्रिया सुळे यांच्याकडून विधानसभेबाबत शब्द हवा असल्याचे समजते आहे.
लोकसभेवेळी राष्ट्रवादीसाठी काम केल्यानंतरही विधानसभेला आपल्या विरोधात राष्ट्रवादी उमेदवार उभा केला जात असल्याची खंत अनेकदा
संग्राम थोपटे यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे यावेळेस सुप्रिया सुळे यांच्याकडून विधानसभेबाबत शब्द घेऊन संग्राम थोपटे
कामाला लागले असल्याचं सांगण्यात येत आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघामध्येही पाहायला मिळत आहे. लोकसभेसाठी इथे काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या
उमेदवारीनंतर काँग्रेस अंतर्गतच नाराजी पाहायला मिळते आहे. ही नाराजी दूर करून काँग्रेस अंतर्गत समन्वय साधण्यासाठी बुधवारी बैठक
घेण्यात आली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचीदेखील बैठक झाली आणि बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून कसबा
विधानसभा मतदारसंघ आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसाठी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबतचा शब्द जाहीररीत्या दिला तरच आम्ही लोकसभेचं काम करू, असंदेखील शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. या निमित्ताने
महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस समोर आली असून, आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार, उभा आहे, तर बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार आणि
मावळमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार उभे असणार आहेत. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार सुरु होताच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या
आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी बारामती आणि मावळमध्ये जाऊ नये. जयचे असेल तर आताच जाऊन यावे. प्रचार
ऐन भरात आलेला असताना या कार्यकर्त्यांनी पळ काढू नये. तसे केल्यास बारामती आणि मावळ मतदारसंघांतील आपले कार्यकर्तेही
पुण्याकडे येतील, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी या बैठकीत दिल्याचे समजते.