केरळ प्रतिनिधी :
दि. ०८ एप्रिल २०२४
सलग दुसऱ्यांदा राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला असला तरी यावेळची निवडणूक सोपी राहिली नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2019 नंतर यावेळीही केरळातील वायनाड हा लोकसभा मतदारसंघ निवडणे पसंत केले आहे. मागील निवडणुकीत त्यांचा अमेठीतून पराभव झाला होता तर वायनाडमध्ये त्यांनी विजय मिळवला होता. यावेळी त्यांच्या अमेठीतून लढण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यांच्यासाठी वायनाडसुरक्षित मानले जात असले तरी यावेळी तिथे भाजपने नव्हे तर इंडिया आघाडीतील त्यांच्याच मित्रपक्षाने आव्हान उभे केले आहे.
वायनाडमध्ये राहुल यांच्या विरोधात भाजपसह कम्युनिस्ट पक्षानेदेखील उमेदवार उतरवला आहे. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन रिंगणात आहेत तर सीपीआयने महासचिव डी. राजा यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ नेत्या एनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राहुल गांधींसाठी ही लढाई अवघड झाली आहे.
सीपीआय ‘इंडिया आघाडी’चा घटक पक्ष आहे. ते इतर काही राज्यांमध्ये एकत्रित लोकसभा निवडणूक लढवत आहेत. पण केरळमध्ये मात्र काँग्रेस आणि सीपीआय कट्टर राजकीय विरोधक असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सीपीआयने एनी राजा यांना उमेदवारी देत राहूल यांच्या अडचणी वाढवल्याचे मानले जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे सीपीआयने ही निवडणूक यावेळी गांभीर्याने घेतल्याची चर्चा आहे.
सातत्याने वायनाडचा दौरा राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाच्या बड्या नेत्यांकडून होत आहे. इतर मुद्द्यांवरून राहुल आणि काँग्रेसला ते घेरत आहेत. प्रचारसभांमध्ये अद्याप राहूल यांनी ‘सीएए’च्या मुद्यावर भाष्य केलेले नाही. इंडिया आघाडीत असलेल्या सीपीआयमध्ये त्यावरूनही नाराजी आहे.
मुस्लिम मतदारांच्या समर्थनाशिवाय वायनाडमध्ये विजय अशक्य असल्याचे मानले जाते. डाव्यांची सत्ता असलेले सरकार त्यामुळेच केरळमध्ये सतत ‘सीएए’ला विरोध करत असते आणि याचाच फटका भाजपऐवजी राज्यात काँग्रेसला बसत आहे. काँग्रेससमोर त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. ‘सीएए’चे समर्थन न केल्यास केरळमधील हिंदूंची मते दूर जाण्याची भिती तर सीएएचा विरोध न केल्यास मुस्लिम मते विभागण्याचे संकट, या द्विधा मनस्थितीत काँग्रेस आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी जेव्हा बुधवारी वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्या रॅलीमध्ये मित्रपक्ष असलेल्या इंडियन यूनियन लीगचे झेंडे दिसले नाहीत. त्यावरूनही डाव्या पक्षांसह भाजपनेसुद्धा काँग्रेसला टार्गेट केले आहे. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये काँग्रेसचे झेंडेसुद्धा दिसत नव्हते. या संपूर्ण रोड शोमध्ये तिरंगाच फडकत होता.