मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२४
१९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्पा पार पडत आहे. सध्या प्रचाराची रणधुमाळी याच पार्श्वभूमीवर सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याबाबत खळबळजनक विधान केले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, असा दावा ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता प्रफुल्ल पटेल यांच्या या विधानावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले…
“पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आम्हाला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भात दोन सभा झाल्या. लोकांमध्ये नक्कीच सकारात्मकता दिसत आहे. या वेळी विदर्भातील लोकसभेच्या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. चंद्रपूरची जागा आम्ही मागच्यावेळी हरलो होतो. पण चंद्रपूरदेखील यावेळी आम्ही जिंकणार आहोत. लोकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ऐकण्यासाठी उत्कंठा पाहायला मिळते आहे. अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी नरेंद्र मोदी यांच्या दोन्ही सभांना होती. पंतप्रधान मोदी यांच्याबाबत लोकांना जिव्हाळा आहे, कारण तीन-तीन तास लोक सभा ऐकतात!”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शरद पवार भाजपमध्ये येण्यास ५० टक्के अनुकूल होते या प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाबाबत विचारता फडणवीस म्हणाले, “मी त्यावर आता या निवडणुकीत काही बोलणार नाही. या विषयासंदर्भात मी आधीदेखील बोललो आहे. पण हे सत्य आहे”, पण हे खरे आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यात ते म्हणाले, “जेव्हा प्रश्न राजकारणाचा येतो, तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. २ जुलै रोजी अजित पवारांसह आमच्या काही नेत्यांनी या सरकामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आम्ही मुंबईत शरद पवार यांना १५ आणि १६ जुलै अशा दोन वेळा भेटलो आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी त्यांना आम्ही विनंती केली. साहेब, झाले ते झाले. आमच्या निर्णयाबरोबर येण्याचे तुम्ही पसंत केले नाही. पण तुम्हाला आमची विनंती आहे की, तुम्ही आमच्याबरोबर या. कारण तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचे आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न करण्याच्या बाबतीत काही कमी केली नाही. त्यानंतर पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची भेट, एका उद्योगपतीच्या घरी झाली. त्यामुळे यामधून आमची आणि त्यांची चर्चा सुरु होती असे संकेत दिसत होते आणि ते (शरद पवार) ५० टक्के तयार होते”,