पुणे प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकांचे वारे वेगात वाहू लागले आहेत. बहुतांश मतदारसंघात उमेदवारी निश्चित झाली आहे आणि उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांनी आपला प्रचार देखील सुरू केला आहे. निवडणुकीची घोषणा झालेल्या दिवसापासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना, निवडणूक प्रक्रियेशी संबधित सर्व घटकांना केंद्रीय निवडणूक आयोगाने केल्या आहेत.
महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघात होणार्या निवडणुकीत पाच टप्प्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी महाराष्ट्रात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार आपल्या उमेदवारांच्या नावाची यादी विविध राजकीय पक्षांनी जाहीर केली आहे.
असे असले तरी काही मतदारसंघातील उमेदवारी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये चार टप्प्यांत मतदान झाले होते. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. आचारसंहिता असल्या कारणाने ५० हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम, रोख स्वरूपात जवळ बाळगता येत नाही.
आचारसंहिता लागू झालेली असल्याने, कारणाशिवाय अधिक रक्कम जवळ बाळगणाऱ्यांची तपासणी करून, चौकशी करून त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारवाई केली जात आहे. त्यातच आचारसंहिता सुरू असतानाही लाखो रूपयांची रक्कम जवळ बाळगणाऱ्यांवर पुणे, नागपूर येथे कारवाई करण्यात आली.
भरारी पथकांनी वाहनांची तपासणी करून पुणे शहर आणि जिल्हा परिसरातून सुमारे 65 लाख रूपयांची रक्कम जप्त केली. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी एका खासगी गाडीची तपासणी केली असता तिच्यामध्ये13 लाख 90 हजार 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या.
तर दुसऱ्या घटनेत, शहरातील कमान पुलाजवळ शिरुर पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी एका वाहनातून 51 लाख 16 हजार रुपये जप्त करण्यात आले. ही सर्व रक्कम सध्या कोषागारात ठेवण्यात आली असून याबाबत चौकशी झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
लोकसभा निवडणूक पारदर्शी आणि चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. विविध भागात भरारी पथकांची नेमणूक निवडणूक आयोगाने केली असून त्यांच्या माध्यमातून ही कारवाई केली जात आहे.
महाराष्ट्रात इतर राज्यातून प्रवेश करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात असून महाराष्ट्र गुजरात सीमेवर तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेवर पथके तैनात करण्यात आली आहेत.
गुजरात आणि इतर राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या चार चाकी वाहने तसेच इतर प्रवासी वाहनांची पोलीस आणि स्थिर नियंत्रण पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे. निवडणूक काळात मतदारांना भुलवण्यासाठी मद्य तसेच पैशाचे आमिष दाखवले जाते.
याला आळा घालण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत कठोर पावले उचलली जात आहेत. पोलिस भरारी पथके, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमण्यात आली आहेत.
भरारी पथकाने नागपूर येथे देखील, पुणे शहर, जिल्ह्याप्रमाणे कारवाई करत रोकड जप्त केली. या कारवाईत एकूण 10 लाख 35 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. एका स्कॉर्पिओ गाडीतून, नागपूर चंद्रपूर हायवेवर ही रक्कम जप्त करण्यात आली.
ही रक्कम कोणाची आहे आणि ती कशासाठी वापरली जाणार होती, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. जप्त करण्यात आलेल्या रकमेचा निवडणुकीशी काही संबंध आहे का? याचाही कसून शोध घेतला जात आहे.