इंदापूर प्रतिनिधी :
दि. १८ एप्रिल २०२४
अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये केलेली भाषणे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. विरोधकांवर निशाणा साधताना या भाषणांमधूनअजित पवार यांनी केलेली वक्तव्ये वादाच्या भोवऱ्यात सापडताना पाहायला मिळत आहेत. अशातच काल (बुधवारी) अजित पवार यांनी इंदापूर येथे एका मेळाव्यादरम्यान तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा’ असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यावर अजितदादांनी आता स्पष्टीकरण दिले आहे.
आज लोकसभा निवडणुकीसाठी बारामती, शिरूर आणि पुणे मतदार संघातील उमेदवारांचे अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज सकाळी अजित पवार यांनी सपत्नीक दगडूशेठ गणपतीची आरती करून बाप्पाला साकडं घातलं. त्यांनी यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले, “अतिशय चांगल्या वातावरणात या लोकसभेच्या निवडणुका पार पडाव्यात यासाठी गणरायाने आशीर्वाद द्यावेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना जास्तीत जास्त उमेदवार महाराष्ट्रातून निवडून देऊन, महाराष्ट्राचा मोठा वाटा त्यामध्ये असावा, यासाठी गणरायाचे दर्शन घेतले. असं असलं तरी प्रचार आणि काम करणं आवश्यक आहे. जनतेचा विश्वास संपादन करावा लागणार आहे. कारण शेवटी जनता जनार्दनच सर्वकाही ठरवणार आहे. त्याने दिलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल.
जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरतेवेळी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे, अशी आमची इच्छा आहे. म्हणून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी पुण्यातील अर्ज भरताना सोबत असणार आहोत. नंतर सातारा, सांगली आणि उद्या धाराशिवला असू असं अजित पवार यांनी सांगितलं.
मी निधी देतो तुम्ही कचाकच बटन दाबा, या वक्तव्यावर बाबत खुलासा करत अजित पवार म्हणाले, “तुम्ही ध चा मा करू नये, मी हे गमतीने हसत हसत बोलत होतो, हा मेळावा सर्व सुशिक्षित, वैद्यकीय क्षेत्रातील आणि वकील मंडळी यांच्या उपस्थितीत एका सभागृहात होता. ती काही जाहीर सभा नव्हती. विविध विकास कामे करण्याचे आश्वासन प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये दिले जाते, मग ते प्रलोभन आहे का? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.
त्या त्या ठिकाणच्या स्थानिक आमदार, खासदारांचे विकास कामांना निधी देण्याचे काम असते, त्यामुळे आम्ही आधीच्या आमदार खासदारापेक्षा जास्त निधी देण्याचे, जास्त विकास करण्याचे आश्वासन देतो आहोत, असं साधं सरळ गणित आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी मी नेहमीच घेत असतो. मी केलेले वक्तव्य हे एका छोट्या हॉलमध्ये होतं. खटाखट खटाखट गरिबी हटाव असं वक्तव्य समोरचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं, त्यामुळे मी कचाकच कचाकच आसा आपल्या ग्रामीण भागातील असलेला शब्दप्रयोग केला. फार कोणी त्याचा बाऊ करू नये, असं अजित पवार म्हणाले.