मुंबई प्रतिनिधी :
दि. ०९ मे २०२४
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी, एकनाथ शिंदे गद्दार आहेत, अश्या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं. संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ मुंबईच्या घाटकोपरमध्ये आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. पाटील हे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ईशान्य मुंबई मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार आहेत. ‘एकनाथ शिंदे गद्दार हैं’ अश्या घोषणा यावेळी चतुर्वेदी यांनी दिल्या.आपल्या या घोषणा ठाण्यापर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असंही त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी श्रीकांत शिंदेंवर ‘दीवार’ सिनेमाचा उल्लेख करत टीका केली. आता एकनाथ शिंदे गटातील नेत्याने त्यानंतर त्यांना उत्तर दिलं आहे.
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘दीवार’ या हिंदी चित्रपटातील संवादाचा उल्लेख प्रियांका चतुर्वेदी यांनी या प्रचारसभेत केला. या चित्रपटातील एक प्रसंग त्यांनी सांगितला. खासदार चतुर्वेदी म्हणाल्या,दीवार चित्रपटात अमिताभ बच्चन एका प्रसंगात त्यांचा हात दाखवतात ज्यावर ‘मेरा बाप चोर हैं’ असं लिहिलेलं असतं. श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर असंच वाक्य लिहिलेलं आहे. श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलंय, ‘मेरा बाप गद्दार हैं.’ सध्या सोशल मीडियावर प्रियांका चतुर्वेदी यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. मात्र या टीकेनंतर आता, “तर मग आदित्य ठाकरेंच्या कपाळावर ‘मेरा बाप महागद्दार है’ असं लिहिलं पाहिजे” असं शिवसेना नेते संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
संजय निरूपम पुढे म्हणाले, “काँग्रेसच्या लोकांना बाळासाहेब ठाकरे ‘किन्नर’ म्हणाले होते व अश्या नामर्द, धोकेबाज लोकांबरोबर मी कधीही जाणार नाही, असंही त्यांचं म्हणणं होतं. त्याऊलट काँग्रेसबरोबर जाऊन उद्धव ठाकरेंनी महागद्दारी केली आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरेंच्या कपाळावर ‘मेरा बाप महागद्दार है’ असं लिहिलं पाहिजे. ‘उबाठा’वाले जनतेत जे नॅरेटिव्ह पसरवू पाहात आहेत ते चुकीचं आहे. बाळासाहेबांची इच्छाच एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी आमदार यांनी पूर्ण केली आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या गद्दारीचा बदला एकनाथ शिंदेंनी घेतला.”
“जे स्वतः गद्दार आहेत त्यांनी आम्हाला गद्दार म्हणू नये, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी तुम्ही महागद्दारी केली आहे. त्यामुळे गद्दार आम्ही नाही तर तुम्ही महागद्दार आहात” असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
“उद्धव ठाकरे यांनी ते हिंदुत्ववादी आहेत की मुस्लिमवादी आहेत हे सांगावं. कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मतदान झालं पाहिजे म्हणून मशिदीतल्या मौलानांवर दबाव टाकला जातो आहे. हा व्होट जिहादच केला जातो आहे. मौलाना, मौलवींना हे मुस्लिमांना भडकवायला सांगत आहेत. धर्माच्या नावावर मतं द्यायला त्यांना सांगितलं जातं आहे. महाराष्ट्र आणि मुंबईतलं हिंदू -मुस्लिम यांच्यातलं चांगलं वातावरण बिघडवण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. याची नोंद निवडणूक आयोगाने घ्यावी आणि पोलिसांनीदेखील याची दखल घ्यावी. उद्या मुंबईत जर काही दंगे भडकले तर त्याची जबाबदारी ही सर्वस्वी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेची असेल”, असंही निरुपम यांनी म्हटलं आहे.