पुणे प्रतिनिधी :
दि. १० मे २०२४
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पुण्यातील विशेष न्यायालयाकडून ११ वर्षांनी आपला निकाल जाहीर झाला आहे. एकूण पाच आरोपी या प्रकरणात होते. विशेष न्यायाधीश यांनी त्यापैकी सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना दोषी मानून जन्मठेप सुनावली आहे. तसेच पाच लाखांचा दंडही त्यांना ठोठावण्यात आला आहे. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या इतर तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
न्यायाधीश जाधव यांनी निकालात नमूद केले आहे की, या गुन्ह्यात डॉ. तावडे याचा हेतू दिसून आलेला आहे. तसेच त्याच्यावर संशय घेण्यासारखी परिस्थितीही आहे. मात्र पोलीस आणि सरकार पक्ष त्याच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत. तर पोलिसांना भावे आणि पुनाळेकर यांच्या विरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात अपयश आलेले आहे. या तीनही आरोपींची त्यामुळे या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. गोळीबार केल्याची कबुली सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी दिली आहे. शिवाय त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावेही पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहेत. या दोघांना त्या आधारे शिक्षा सुनावण्यात येत आहे.
ज्या आरोपी क्र. १ वीरेंद्र तावडे यांच्यावर कटकारस्थान रचल्याचा आरोप होता, त्यांना निर्दोष सोडले आहे. मारेकऱ्यांना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला आरोपी संजीव पुनाळेकर यांनी दिला होता. त्यांनाही निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. विक्रम भावे हे निर्दोष ठरले आहेत. शरद कळसकर आणि सचिन अंदूरे, अनुक्रमे आरोपी क्र. २ आणि ३ यांना भारतीय दंड विधान कलम ३०२ आणि ३४ खाली दोषी ठरविले गेले आहे. यानुसार त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा दंड न भरल्यास आणखी वाढणार आहे, सरकारी वकिलांनी ही माहिती दिली.
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी सकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांना थांबवले आणि अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. महाराष्ट्रासह देशातही डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे वृत्त समजताच खळबळ उडाली. पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का होता. एखाद्या विचारवंताची हत्या, पुरोगामी महाराष्ट्रात अश्या प्रकारे होते, या वास्तवाने कित्येकांना अस्वस्थ केले.
सुरुवातीला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पुणे शहर पोलिसांसह दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केला. त्यानंतर हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला. सनातन संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (रा. सातारा), सचिन अंदुरे (र. छत्रपती संभाजीनगर), शरद कळसकर (रा. जालना), विक्रम भावे आणि ॲड. संजीव पुनाळेकर (दोघे रा. मुंबई) यांना डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात अटक करण्यात आली. पुण्यातील विशेष न्यायालयात त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. पनवेलमधील सनातन संस्थेच्या आश्रमातून डॉ. तावडेला अटक करण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी घटनास्थळाची पाहणी केल्याचा आरोप विक्रम भावे याच्यावर ठेवण्यात आला आहे. डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना ॲड. पुनाळेकर यांनी पिस्तूल खाडीत फेकून नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.