पुणे प्रतिनिधी :
दि. १३ मे २०२४
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, शिर्डी यांसह इतर काही जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया सुरु झाली असून लोक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार केंद्राबाहेर रांगेत दिसू लागले आहेत. पुण्यात मतदान केल्यावर मराठी अभिनेता सुबोध भावेने प्रतिक्रिया दिली आहे.
सुबोध म्हणाला, “मला लोकशाहीने दिलेल्या हक्कानुसार माझ्या एका मताची किंमत खूप मोठी आहे याची जाणीव मला आहे. म्हणून मी प्रत्येक वेळी मुंबईहून प्रवास करून मतदानासाठी पुण्यात येतो, मुंबईत मग परत जाऊन काम करतो. मी आणि माझी पत्नी दोघेही मतदान करतो, माझा मुलगाही लवकरच १८ वर्षांचा होईल, तोही मतदान करेल. लोकशाहीचा हा उत्सव आहे, हा उत्सव निवडणुकांचा आहे. आमदार, खासदार आपण दिलेल्या मतांच्या आधारे निवडून येतात. आपण मत दिलं नाही तर काय फरक पडणार आहे, असा निराशावादी विचार करून तुम्ही घरात बसून राहू नका. त्याने कोणताही बदल घडणार नाही. तुम्ही कुठल्याही उमेदवाराला, जो तुम्हाला योग्य वाटतो, त्याला मत द्या, पण मत द्या. मत वाया घालवू नका.”
यावेळी सुबोधने बोगस मतदानाचाही उल्लेख केला. तो म्हणाला, “बोगस मतदानाचे प्रकार अनेकदा घडतात. तुमच्याऐवजी दुसरं कोणीतरी मतदान करतं. तुमचं नाव यादीत आलं नसेल तर संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारा. आपलं प्रथम राष्ट्रीय कर्तव्य म्हणजे मतदान आहे जे आपण पार पाडायला पाहिजे. कोणतीही आस्थापना, संघटना अथवा कुठलीही कंपनी तुम्हाला मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही. कोणतीच शक्ती मतदानापासून तुम्हाला रोखू शकत नाही. मतदान म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य आहे, तसेच ती जबाबदारी आहे. आपल्याला योग्य वाटणारा उमेदवार आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम करू शकतो.”
सुबोध भावे, फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल विचारलं असता म्हणाला, “त्याविषयी मला काहीच बोलायचं नाही. त्याबद्दल मला शून्य इंटरेस्ट आहे, पण मला हे माहित आहे की मला कोणाला मतदान करायचं आहे आणि जे माझं ठरलेलं आहे. मला हेही माहित आहे की ते माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे.”
मतदानाची टक्केवारी कमी होण्यावर सुबोधने लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. “मत द्या, मतदानाचा कंटाळा खरंच करू नका. हे काम फक्त ५-१० मिनिटांचं असतं, तुम्हाला जाऊन बटण दाबून मत द्यायचं असतं. टक्केवारी कमी झाल्यास तुम्हाला अपेक्षित नाही असा उमेदवार कदाचित निवडून येऊ शकतो. तुम्हाला बदल घडायला पाहिजे असेल तर बाहेर पडा आणि मत द्या,”