मुंबई प्रतिनिधी :
दि. ०७ ऑगस्ट २०२४
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रातही त्याचे पडसाद उमटत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचा निषेध केला आणि आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेच्या उमेदवारांवर दलित बहुजन, आदिवासी ओबीसी बहुजन सर्व मतदारांनी बहिष्कार घालावा, अशी मागणी केली. तर त्याचवेळी राज ठाकरे यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे, असे आवाहनही रामदास आठवलेंनी केले.
सोमवारी मराठा आंदोलकांशी चर्चा करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात आरक्षणाची गरज नाही, असे विधान केले होते. या विधानावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. जोपर्यंत या देशात जाती व्यवस्था अस्तित्त्वात आहे तोपर्यंत आम्ही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. संविधानाद्वारे दलित आदिवासींना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेले आहे. दलित आदिवासींचे आरक्षण हे जातीवर आधारित आहे. जातिव्यवस्था कायद्याने जरी संपली असली तरीही या देशात खेड्यापाड्यात आजही दलित आदिवासींवर जातीवरून अत्याचार होतात. त्यामुळे दलित आदिवासींचा, संविधानाने दिलेल्या आरक्षणावर हक्क आहे. राज ठाकरे एका पक्षाचे नेते असून त्यांना महाराष्ट्राचे नवनिर्माण करायचे असेल तर त्यांनी आरक्षणाला विरोध करू नये. आरक्षणाला विरोध करणे चुकीचे असल्याचे रामदास आठवले मंगळवारी म्हणाले.
आर्थिक दृष्ट्या मागासांनाही राज्यात १०% आरक्षण मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणाचा मराठा आणि ब्राह्मण समाजातील गरिबांनाही लाभ मिळतो आहे. या आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय जनतेतही राज ठाकरेंच्या आरक्षण विरोधी भूमिकेबद्दल तीव्र नाराजी असल्याचे मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीने तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गाचे दोन स्वतंत्र प्रवर्ग केले पाहिजेत आणि यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या ओबीसीच्या प्रवर्गाला धक्का न लावता दुसरा ओबीसीचा प्रवर्ग तयार करावा आणि त्याद्वारे मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण देण्यात यावे अशी सूचना आठवले यांनी यावेळी केली.