सोलापुर प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. १७ मे २०२१
सन २०१९ साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सध्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांनी सर्व शक्ती आमदार शहाजी पाटील यांच्या पाठिशी उभी केल्यामूळे त्यांचा निसटता विजय झाला होता. आज, दिपक साळुंखे पाटील यांची ओळख शरद पवार, अजित पवार यांचे निष्ठावंत व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते म्हणून राज्यभर आहे. त्यांनीच ज्यांना आमदार होण्यासाठी मदत केली त्या आमदार शहाजी पाटील यांनी उजणी धरणातील ५ टिएमसी पाणी इंदापुरला देण्यावरुन राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्यावर खरमरीत टिका केली आहे. तेंव्हा, दिपक आबा व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणती भूमिक घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आमदार शहाजी पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेला जरी सावरुन घेण्याचा नुकताच प्रयत्न केला आहे. असे असले तरी एकदा बोलले शब्द पुन्हा येत नाहीत, त्यामूळे राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पवारप्रेमी यांचा आमदार शहाजी पाटील यांच्यावरील राग कमी झाला नसल्याचे सोशल मिडियातून दिसून येते.
जिकडे राष्ट्रवादी त्यांचा विजय हे सांगोला तालुक्याच्या राजकारणाचे गणित बनल्याचे गेल्या ३ निवडणूकांवरुन लक्षात येते. सन २००९ व २०१४ साली सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांनी विक्रमवीर माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पाठीशी ताकद उभी केल्यामूळे या दोन्ही निवडणूकांमध्ये देशमुख यांचा विजय झाला. सन २०१९ साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत दिपक साळुंखे पाटील यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या निसटत्या विजयात मोलाची कामगिरी बजाविली होती.
एकेकाळी काँग्रेस पक्षाचे असणारे शहाजी पाटील हे सध्या महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुक घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे आमदार आहेत. तेंव्हा, त्यांनी महाविकास आघाडी सरकार व शरद पवार यांच्यावर केलेली टिका निश्चितच सर्वांना विचार करायला लावणारी आहे. त्यामूळे त्यांच्या या टिकेवर सांगोला तालु्क्यातील राष्ट्रवादी व दिपक साळुंखे पाटील कोणती रिअॅक्शन देतायेत हेही महत्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मदत केली म्हणून शहाजी पाटील आमदार झाले आहेत हे विसरु नका असे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोशल मिडियातून प्रतिक्रिया देत आहेत.
सततच्या पराभवाने राजकीय दृष्ट्या खच्चीकरण झालेल्या शहाजी पाटील यांनी सन २००९ साली माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार निवडणूकीस उभे असताना जोरदार प्रचार केला होता. त्या निवडणूकीत माजी आमदार गणपतराव देशमुख, आमदार शहाजी पाटील, दिपक साळुंखे पाटील, श्रीकांत देशमुख व चेतनसिह केदार ही प्रमुख मंडळी शरद पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले होते. विशेष म्हणजे, त्यावेळी चिणके येथे झालेल्या सभेत शहाजी पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे भावनिक होऊन केलेल्या मदतीची ही चर्चा केलेल्या टिकेमुळे तालु्क्यात पुन्हा सुरु झाली आहे. शहाजी पाटील यांना एकेकाळी शरद पवार हे किती योग्य, सक्षम व सर्वश्रेष्ठ राजकारणी आहेत असे वाटत होते, मग भाजपच्या मंडळीनी घरासमोर आंदोलन केल्यावर एकदमच शरद पवार चुकीचे कसे काय वाटू लागल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विचारत आहेत.
शिवाय, नुकत्याच झालेल्या चुरशीच्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत आमदार शहाजी पाटील हे महाविकास आघाडीचे आमदार असून ही ते साधे फिरकले सुद्धा का ? नाहीत असा सवाल दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादी प्रेमी विचारत आहेत. यातून ते जिल्हा परिषदेतील कोणता नेमका पैरा फेडत आहेत असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामूळे आमदार शहाजी पाटील यांच्या मनात नेमकं चाललंय काय हा खरा प्रश्न सर्वांना पडला आहे.
पुढच्या वर्षी होणा-या जिल्हा परिषद, पंचायत समिती व पुढील काही महिन्यात होऊ घातलेल्या सांगोला नगरपरिषद निवडूकीमध्ये आमदार शहाजी पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेचा काय परिणाम होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सांगोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व दिपक साळुंखे पाटील हे पक्षाच्या प्रमुख नेत्यावर टिका करुन ही आमदार शहाजी पाटील यांना पुढे मदत करणार असेल तर साळुंखे यांच्या पवार निष्ठेविषयी सुद्धा शंका घेतली जाऊ शकते.
सर्वांत महत्वाची बाब म्हणजे, साळुंखे पाटील हे शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे नेते असुन त्यांनी शहाजी पाटील यांनी केलेल्या टिकेला अजुनही उत्तर दिले नाही याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. सन २०१९ सालच्या विधानसभा निवडणूकीत पक्षाने तिकिट नाकारलेल्या दिपक साळुंखे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात असणा-या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो कार्यालयाबाहेर फेकून देण्यात आले होते. त्यानंतर दिपक साळुंखे पाटील यांनी भाजप-शिवसेना सरकार पुन्हा येईल म्हणून पवार निष्ठेच्या त्याग करुन तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या सावलीखाली जाण्याचे ठरविले होते. मात्र, निवडणूकानंतर घडले उलटे आणि महाविकास आघाडीचे सरकार येऊन राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली. त्यामूळे दिपक साळुंखे यांनी प्रारंभी शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या गाठीभेटी घेऊन पक्षात असल्याचे जाणवून दिले. त्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन बढती दिली. सन २०१० नंतर सोलापुर जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिपक साळुंखे पाटील यांना आंदण दिल्यासारखी होती. कारण, जिल्ह्याचे विधानपरिषदेचे आमदार तेच, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्यांच्या भगिनी व सोलापुर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद ही दिपक साळुंखे पाटील यांच्याकडे होते. तेंव्हा, पक्षाने एवढे देऊन ही पक्षाच्या प्रमुख नेत्यावर स्वतःच्या तालुक्यातील नेता गंभीर टिका करित असताना ही दिपक साळुंखे गप्प का ? असा प्रश्न पवार प्रेमी विचारत आहेत. जिल्ह्यातील सच्चे एकनिष्ठ राष्ट्रवादी प्रेमी चर्चा करित आहेत की, ज्या अर्थी दिपक साळुंखे हे शहाजी पाटील यांच्या पवारांवरील गंभीर टिकेला उत्तर द्यायचे ठाळत आहेत त्याचा अर्थ त्यांची मानकिता आणखी फोटो फेकून दिल्यासारखीच आहे का. ?
त्यामूळे पुढील काळात दिपक साळुंखे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व शरद पवार यांच्यावरील निष्ठेचा कस लागणार आहे. शिवाय, आमदार शहाजी पाटील यांना पुढील राजकीय कारकिर्दीत शरद पवार यांच्यावर केलेली टिका भोवणार का ? हे येणारा काळच ठरवेल.