रायगड प्रतिनिधी :
दि. २४ मे २०२५
पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून येत्या ३६ तासांत ते अधिक तीव्र होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या चक्रीवादळाला ‘शक्ती’ असे नाव देण्यात आले आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून त्याचा थेट फटका कोकण किनारपट्टीला बसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील तसेच अतिवृष्टीचाही धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबईसह उर्वरित कोकणला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२०मे पासून पूर्व मोसमी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. कोकणात, विशेषतः तळकोकणात गेले २ दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील ३ दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून १५ ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामानविभागाने दिला आहे.
मान्सूनचे वेळेआधी आगमन
अवकाळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले असताना आणि शक्ती चक्रीवादळ घोंघावत असताना मान्सूनचे वेळेआधी आगमन होण्याचे संकेत मिळत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस मान्सून कोकण किनारपट्टी काबीज करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, येत्या काही तासांतच मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणे अपेक्षित आहे. भारतीय कालगणनेनुसार २५ मे ला रोहिणी नक्षत्र सुरू होते आणि रोहिणीचा पाऊस पडतो व तो आगामी मान्सूनचे संकेत देतो असे जाणकार सांगतात. यावर्षी तर २५ मे ला मोसमी पाऊसच दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून या आठवड्यात केरळ, बनर्नाटक, गोवा, महाराष्ट्रातील कोकण आणि गुजरातपर्यंत धडकणार असून या सर्व ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
अपडेट :
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार मान्सून केरळात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातही मान्सून एक आठवडा आधीच येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.