चांपा प्रतिनिधी : अनिल पवार
दि. २७ मे २०२५
उमरेड तहसीलमधील चांपा, हळदगांव, परसोडी आणि सायकी परिसराला उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या ८ किमी लांबीच्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्यावर ४० टन क्षमतेचा सिमेंट रस्ता बांधण्याच्या मागणीसाठी चांपा येथील माजी सरपंच अतिश पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि स्थानिकांना अपघात, धूळ आणि आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.या परिसरात असलेल्या डझनभर क्रशर प्लांटमुळे ओव्हरलोडेड ट्रक आणि टिप्परची सतत वाहतूक सुरू असते, ज्यामुळे रस्त्यावर खड्डे, पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धूळ यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार, त्वचाविकार आणि डोळ्यांचे आजार वाढले आहेत. शेतकरी पुष्कर बुट्टी यांनी सांगितले की, क्रशर प्लांटमधून निघणारी धूळ आणि ओव्हरलोड वाहनांमुळे शेतपिकांचे नुकसान होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
हळदगांवचे सरपंच गोविंदा हाते यांनी सांगितले की, सर्व ग्रामपंचायतींनी सिमेंट रस्त्याच्या बांधकामाच्या मंजुरीचा प्रस्ताव शासन दरबारी दिला आहे, परंतु प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. माजी सरपंच अतिश पवार यांनी नमूद केले की, क्रशर प्लांटमुळे खनिकर्म विभागाला कोट्यवधींचा महसूल मिळतो, तो या रस्त्याच्या विकासासाठी वापरला जावा. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी विपीन इटनकर आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही समस्येचे निराकरण झालेले नाही.
ग्रामस्थांनी प्रशासनाला लवकरात लवकर चांपा – हळदगाव – परसोडी – सायकी रस्त्याचे सिमेंटकरण करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक बहिष्काराचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा दिला आहे.