पुणे प्रतिनिधी :
दि. २९ मे २०२५
पुण्यातील डी. पी. रोडवर २७ मे रोजी रात्री १२ वाजता एका कॅफेसमोर तीन तरुणांनी दहशत माजवली. तोंडाला रुमाल बांधून हातात कोयते आणि पालघनसारखी हत्यारे घेऊन त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर तीन दिवस उलटूनही पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, त्यामुळे या घटनेमागचे कारण अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन अनोळखी तरुण दुचाकीवरून कॅफेजवळ आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते आणि त्यांच्या हातात कोयता व इतर धारदार शस्त्रे होती. त्यांनी फक्त दीड मिनिटात कॅफेमध्ये प्रवेश केला आणि लगेच बाहेर येऊन गाड्यांवर हल्ला केला. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींची तोडफोड केली. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर तीन दिवस झाले तरी, संबंधित पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. “ना गुन्हा नोंदवण्यात आला आहे, ना पोलिसांकडून कोणती कारवाई झाली आहे,” त्यामुळे या प्रकरणातील मूळ कारण काय आहे हे अजून समजू शकलेले नाही.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. तरीही, पोलिसांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कॅफेच्या मालकाने देखील तक्रार दाखल केली आहे की नाही, याची माहिती समोर आलेली नाही. यामुळे स्थानिक लोकांमध्ये नाराजी आणि भीती पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास कधी सुरू करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.