मुंबई प्रतिनिधी :
दि. ३ जून २०२५
भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. ठाकरे गट हा जमीनदोस्त होणार असल्याचा दावा महाजनांनी केला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाजन हे भाजप सोडणार असल्याचा दावा खळबळजनक दावा केला आहे.
भाजप हा पक्ष एकेकाळी पवित्र, हिंदुत्त्ववादी,आणि सुसंस्कृत अशा लोकांचा पक्ष होता. या पक्षाचं नेतृत्त्व अटलजी, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, महाराष्ट्रामध्ये वसंतराव भागवत, भाऊसाहेब फुंडकर गोपीनाथ मुंडे याच्यापर्यंत सार्यांनी केलं. आता या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत? दलाल, भ्रष्ट असे हे लोक आहेत. हातात पोलीस, पैसे आहेत. त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे. त्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत त्यातील एक म्हणजे गिरीश महाजन आहेत. मला त्यांच्याविषयी फार काही बोलावं वाटत नाही, ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांच्या आर्थिक घोटाळे आणि इतर भानगडींच्या चौकशा सुरू झाल्या होत्या तेव्हा निरोप पाठवत होते की मी राजकारणातून बाहेर पडतो आणि शांत बसतो. हे डरपोक आणि गांXX लोक आहेत, असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे.
प्रत्येकाची वेळ येते आणि आमचीही वेळ येणार आहे. बाळासाहेबांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा वापरत आहात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने चड्डीची नाडी बांधायला शिकवली. राजकारणामध्ये तुम्ही कोण होतात? आमचे काही निर्लज्ज लोक याच महाजन यांच्या बाजूला थांबून फोटो काढत होते. गिरीश महाजन हे जे बोलतायेत ही भाषा त्यांना आणि पक्षाला घेऊन बुडणार आहे. शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आतापर्यंत ज्यांनी शिवसेनेतून बाहेर पडले आणि सेना संपवण्याची भाषा केली. अमित शहांनी तर शिवसेना संपवण्यासाठी जंग जंग पछडले, त्यांना महाराष्ट्र संपवायचा आहे. ज्यांना महाराष्ट्र संपवायचा आहे त्यातील गिरीश महाजन हे हस्तक असून ते मराठी द्रोही असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी महाजनांवर निशाणा साधला.
शिवसेना संपवणं हे गिरीश महाजन यांच्या दहा पीढ्या उतरल्या तरी जमणार नाही. दोन-चार माणसं फोडणं म्हणजे पक्ष संपवणं असतं का? नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारत बोलत होते ना? उलट त्यांच्या काळात काँग्रेस पक्ष वाढला. उलट आता काँग्रेसच्या खासदारांना परदेशात पाठवून भारताची भूमिका मांडायला लावली. गिरीश महाजन यांचा अभ्यास कच्चा आहे. अशी नाचेगिरी करणं म्हणजे राजकारण नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.