पुणे प्रतिनिधी :
दि. १० जून २०२५
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर शरद पवारांनी पाटील यांना लगेच निर्णय न घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला आहे. जयंत पाटील यांनी पक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, असे मत मांडलं होतं. मात्र, शरद पवारांनी त्यांना निवडणुकीनंतर यावर विचार करू, असं स्पष्ट सांगितलं आहे.
पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले, “मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे.” त्यांनी पुढे कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन की, नवीन लोकांना संधी द्यावी. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे.” त्यांच्या या बोलण्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि त्यांनी जयंत पाटील यांच्या इच्छेला विरोध दर्शवला.
यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, जयंत पाटलांनी लगेच असा निर्णय घेऊ नये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर याबद्दल विचार करू, असे पवारांनी सुचवले.
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीकाही केली. ते म्हणाले, “राष्ट्रवादीने राष्ट्रहिताच्या बाबतीत कधीच राजकारण केलेले नाही. पहलगाम हल्ल्यानंतरही आम्ही हीच भूमिका स्वीकारली. सरकारच्याच भूमिकेचे समर्थन केले, पाठिंबा दिला.”
देशाच्या परराष्ट्र धोरणावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, “देशाच्या नकाशाचा विचार करता चीन व पाकशी आपले संबंध चांगले नाहीत. बांगलादेशच्या बरोबरही मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले नाहीत. श्रीलंकेबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत असे वाटत नाही. यापूर्वी देशात व लगतच्या राष्ट्रांबरोबरही सुसंवाद होता. आता हा सुंसवाद जाणीवपूर्वक ठेवला जात नाही,” अशा शब्दांत पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.