उमरेड प्रतिनिधी : अनिल पवार
दि. ११ जून २०२५:
नागपूर जिल्ह्यातील चांपा परिसरातील २२ गावांमधील रस्त्यांची दुरवस्था गंभीर बनली असून, स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चांपा, हळदगाव, परसोडी, डव्हा, खापरी, उमरा, तिखाडी, सायकी आदी गावांमधील रस्ते गेल्या १५ वर्षांपासून दुरुस्तीविना धूळ आणि चिखलाने भरलेले आहेत. परिसरातील डझनभर क्रशर प्लांटमुळे उडणारी विषारी धूळ आणि पावसाळ्यात चिखलमय रस्त्यांमुळे ग्रामस्थांचे जीवन असह्य झाले आहे.माजी सरपंच अतिश पवार यांनी या समस्येकडे लक्ष वेधत, चांपा-हळदगाव-परसोडी-खापरी रस्त्याच्या ४० टन क्षमतेच्या पक्क्या सिमेंट रस्त्याच्या निर्मितीसाठी प्रशासनाकडे आग्रही मागणी केली आहे. त्यांनी ग्रामस्थांसह एकत्र येत या प्रश्नावर एल्गार पुकारला आहे.
“रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. क्रशर प्लांटमुळे उडणारी विषारी धूळ शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहे. पावसाळ्यात रस्ते चिखलमय होतात, ज्यामुळे ये-जा करणे अशक्य होते,” असे अतिश पवार यांनी सांगितले.
या मागणीसाठी चांपा, हळदगाव, परसोडी, उमरा, तिखाडी, सायकी, डव्हा आणि खापरी परिसरातील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि नागपूर जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्याकडे निवेदन घेऊन पोहोचले आहेत.ग्रामस्थांनी पक्के सिमेंट रस्ते बांधण्याची मागणी करत, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी विनंती केली आहे.
ग्रामस्थांनी आक्रोश व्यक्त करत “आम्हाला मूलभूत सुविधा हव्यात!”चांपा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था ही केवळ प्रवासाची समस्या नाही, तर ती आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न बनली आहे. क्रशर प्लांटमुळे उडणारी धूळ श्वसनाचे आजार वाढवत आहे, तर चिखलमय रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना आपला माल बाजारात नेण्यास अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि महिलांना दैनंदिन कामांसाठी मोठ्या कष्टांचा सामना करावा लागतो. “आम्ही गेल्या १५ वर्षांपासून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विनवण्या करत आहोत, पण प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही,” अशी खंत हळदगाव येथील स्थानिक शेतकरी सुनील पोहनकर, गोविंदा ढगे,रुपेश हजारे, संगीता नेवारे, लक्ष्मीकांत धोपटे, आदी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
माजी सरपंच अतिश पवार, शेतकरी नेते गोविंदा ढगे, सुनील पोहणकर यांनी ग्रामस्थांना एकत्रित करत या प्रश्नाला वाचा फोडली आहे. त्यांनी प्रशासनाला आव्हान देत म्हटले, “जर प्रशासनाला आमच्या मुलभूत सुविधांची काळजी नसेल, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.” त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी एकजुटीने हा प्रश्न लावून धरला आहे. “हा फक्त रस्त्यांचा प्रश्न नाही, तर आमच्या जीवनमानाचा प्रश्न आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे,” असे पवार यांनी ठणकावले.
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्याकडे शेतकरी व ग्रामस्थांनी निवेदन सादर केले असून, याबाबत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या असल्या, तरी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
चांपा परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाला रस्त्यांच्या सिमेंटिकरणासाठी अल्टिमेटम दिला आहे. जर येत्या काही महिन्यांत कारवाई झाली नाही, तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हा प्रश्न केवळ चांपा परिसरापुरता मर्यादित नसून, नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेचे प्रतीक आहे. प्रशासन यावर किती तत्परतेने कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चांपा परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन तातडीने खणीकर्म विभागांतर्गत निधीतून ४० टन क्षमतेच्या पक्क्या सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू करावे. “आम्ही फक्त मूलभूत सुविधा मागत आहोत. हा आमचा हक्क आहे,” असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रशासन काय पावले उचलते, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा हा प्रश्न प्रशासनाला कधी जाग आणतो हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. चांपा परिसरातील ग्रामस्थांचा लढा यशस्वी होईल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.