सांगली प्रतिनिधी :
दि. ११ जून २०२५
डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांचे अखेर ठरले आहे, त्यांनी ठाकरे सेनेला रामराम ठोकला असून महायुती सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे ठाकरे सेनेला मोठा हादरा बसणार आहे.
चंद्रहार पाटील यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर पोस्ट केली. यामध्ये त्यांनी लिहिले की, राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना, बऱ्याच त्रुटी, अडचणी, गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु, प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं चंद्रहार पाटील म्हणाले.
चंद्रहार पाटील सोमवारी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाकरेंच्या मशालीची साथ सोडून धनुष्यबाण हातात घेणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट, मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री प्रताप सरनाईक हे ही उपस्थित राहाणार आहेत.
दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीत उतरले होते. सांगली लोकसभेच्या जागेवरुन हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. मविआत असतानाही त्यांच्याविरोधात काँग्रेसचे विशाल पाटील निवडणुकीत उतरले. विशाल पाटलांनी निवडणुकीत बाजी मारली. त्यामुळे चंद्रहार पाटील नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. यातच काही दिवसांपासून चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने पाटलांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. तर श्रीकांत शिंदेंनीही डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत, असे कौतुकाचे बोल उद्गारले होते. ते जर आमच्या शिवसेनेत येणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे, असे म्हटले होते.