ठाणे प्रतिनिधी :
दि. १२ जून
अंबरनाथ रेल्वे स्थानकावर एक मोठी दुर्घटना होता होता टळली. लोकल पकडण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्म आणि रुळांमधील अंतर लक्षात न आल्याने प्रवासी थेट रुळांवर कोसळला. परंतु, सुरक्षा जवान आणि इतर प्रवाशांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचले.
मुंबई महापालिकेचे कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने अंध आहेत. ते संध्याकाळी ७ वाजता कर्जतला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते. लोकल पकडण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने ते रेल्वे रुळावर पडले. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा जवान अमोल देवरे यांनी ते पाहिले. आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवले.
सिद्धनाथ माने हे अंबरनाथ रेल्वे स्थानकावर उभे होते. “लोकल आल्याची घोषणा झाली असता ते लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावले,” असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याचवेळी समोरून कर्जतकडे जाणारी लोकल येत होती. माने यांना प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने ते थेट रेल्वे रुळावर कोसळले. त्याचवेळी सुरक्षा जवान अमोल देवरे यांनी हे पाहिले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता रुळावर उडी मारली. त्यांनी माने यांना उचलून प्लॅटफॉर्मवर आणले. यावेळी काही प्रवासी देखील त्यांच्या मदतीला धावले. ही संपूर्ण घटना स्टेशनवरील CCTV मध्ये कैद झाली आहे. अमोल देवरे यांच्या प्रसंगावधानामुळे एका दिव्यांगाचे प्राण वाचले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, दक्षिण मुंबईत कामावर येताना गर्दीच्या वेळी नोकरदारांना लोकलमधून अनेकदा लोंबकळत यावे लागते. अशाच काही नोकरदारांचा सोमवारी मुंब्य्राजवळ भीषण अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर नोकऱ्यांच्या विकेंद्रीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सर्व नोकऱ्या एकाच ठिकाणी असू नयेत, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नियोजन केले आहे. भिवंडी-निजामपूर महापालिकेजवळील खारबाव येथे विकास केंद्र विकसित होणार आहे. प्रस्तावित विरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडॉर, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे, दिल्ली फ्रेट कॉरिडॉर आदी प्रमुख पायाभूत सुविधांच्या निमित्ताने तेथे विविध गुंतवणूक आकर्षित करणारे केंद्र विकसित केले जाणार आहे. कल्याण येथेही व्यावसायिक आणि निवासी संकुल, शैक्षणिक संस्था आदींसाठी विकास केंद्र उभे केले जाणार आहे. तेथे राहणाऱ्यांना त्याच ठिकाणी नोकऱ्या व रोजगार उपलब्ध करण्याची योजना आहे.