मुंबई प्रतिनिधी :
दि. २२ जुलै २०२५
मुंबई: राज्यात सध्या नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच ठाण्यातील एका होमगार्ड असलेल्या महिलेने प्रसारमाध्यमांसमोर येत दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. करुणा मुंडे यांनी या महिलेला समोर आणत हा कसलाही हनी ट्रॅप नसून सदर महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. “होमगार्ड असलेल्या महिलेवर दोन एसीपींनी लैंगिक अत्याचार केला. तिने तक्रार दाखल करू नये म्हणून पोलिसांनी तिच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केला. तसंच तिच्या मुलींनाही त्रास देण्याचं काम सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही महिला न्याय मिळवण्यासाठी फिरत आहे, मात्र तिची कोणीही दखल घेतली नाही. कारण या प्रकरणातील आरोपी एसीपी असल्यामुळे कोणीही महिलेची मदत करायला तयार नाही,” असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
पीडित महिलेने पत्रकार परिषदेत ठाण्यातील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो दाखवत आरोप केला की, ” ठाण्यातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने जिम परिसरात माझ्याशी ओळख केली. मी तुम्हाला ओळखतो, असं सांगून त्याने माझा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तो मला सातत्याने मोबाईलवर चांगले-चांगले मेसेज करत होता. एक दिवस त्याने मला त्याच्या घरी चहा प्यायला बोलावलं. तसंच तुम्ही माझ्या घरी चहा प्यायला यावं, अशी माझ्या बायकोची इच्छा असल्याचं सांगितलं आणि फोनवर माझं एका महिलेशी बोलणं करून दिलं. त्याची बायको आपल्याशी फोनवर बोलली आहे, असं समजून मी त्याच्या घरी चहा प्यायला गेले. पण तिथं गेल्यावर त्याने मला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं आणि त्याने आणि त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका पोलिसाने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला,” असा आरोप पीडितेने केला आहे.
“मला शुद्ध आल्यानंतर मी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, पण तिथं माझी तक्रार घेतली नाही. त्यानंतर मी डीसीपी, सीपी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून माझ्यासोबत झालेला प्रकार सांगितला, पण कोणीही दखल घेत नाही. माझं राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगणं आहे की पुढील ८ दिवसांत जर तुम्ही या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला नाही तर मी माझं आयुष्य संपवणार आहे,” असा इशाराही सदर महिलेने दिला आहे.
दरम्यान, “होमगार्ड असलेल्या महिलेवरच जर अत्याचार होत असेल तर महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांच्या सुरक्षेचं काय? महाराष्ट्रात शासन प्रशासन कुठे आहे? महिलांच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. शासकीय अधिकारी आणि आजी-माजी मंत्री मन भरून हनीमून करत आहेत, मात्र मन भरल्यानंतर त्यांना तेच हनी ट्रॅप वाटत आहे,” असा हल्लाबोल करुणा मुंडे यांनी केला आहे.