दौंड प्रतिनिधी :
दि. ०२ ऑगस्ट २०२५
सध्या दौंड तालुक्यातील यवतमध्ये शांततेचं वातावरण आहे. काल घडलेल्या घटनेमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. पोलिसांनी मात्र आता परिस्थिती आटोक्यात आणली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू केले आहे. यवतमधील सर्व दुकानं आणि व्यापार त्यामुळे बंद आहेत. नागरिकांनी घोळक्याने उभे राहू नये, काम नसल्यास घराबाहेर पडू नये, असं आवाहन पोलीस सगळीकडे करत आहेत. येथे शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पोलिसांनी रात्रीपासूनच, शुक्रवारी दंगल घडवणाऱ्या आरोपींची धरपकड सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मात्र यवत येथे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या झालेल्या सभेत अनेकांची चिथावणीखोर भाषणं झाली.
मध्यप्रदेश इथे एका ६० वर्षांच्या महाराजाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला असं शुक्रवारी सकाळी एका तरुणाने एका चॅनेलवर आलेल्या बातमीचं स्टेटस ठेवलं होतं. हे निमित्त साधून ही संपूर्ण दंगल झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत २० जणांना अटक केली असून अजूनही अनेक जणांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, पुण्यातील यवतमध्ये चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. यावरुन यवतसह दौंड तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना केलेल्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली.
यादरम्यान शुक्रवारी यवतमध्ये काल गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्यासह किन्नर आखाड्याच्या प्रमुख जगद्गुरु स्वामी हेमांगी सखीजी यांची भाषणं झाली. त्यानंतर फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून पुन्हा तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर शुक्रवारी थेट सकाळी बाजारपेठ बंद करण्यात आली. काही घरांवर, बेकरी आणि धर्मस्थळांवर जमावाने हल्ला केला. यात काही दुकानं आणि घरांना आगी लावण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर यवतमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.