मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ ऑगस्ट २०२५
मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध आणि आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी! तिनं उत्तम अभिनय आणि देखण्या रूपाच्या बळावर इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. पण प्राजक्ताचा हा प्रवास सोपा होता का? नक्कीच नाही. नुकताच अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान तिच्या संघर्षांचा काळ सांगितला आहे.
प्राजक्ता माळीने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली स्ट्रगल स्टोरी सांगितली आहे. प्राजक्ता सुरुवातीच्या काळात पुण्याहून मुंबई असा रोज प्रवास करायची. मुलाखतीदरम्यान प्राजक्ता म्हणाली की, “मी ना खूप काही बघितलंय. माझं टीन एज जसं संपलं, म्हणजे वयाच्या १७व्या वर्षानंतर खूप वाईट काळ मी पाहिलाय. त्यामुळे मी स्ट्रॉन्ग गर्ल बनले आणि त्यानंतर मला कळलं की, नाही तुम्ही इतकं शांत राहिलात, तर तुम्ही कुठेच नाही पोहचू शकणार आणि एवढं शांत तर मी नाही राहू शकत. मी आलीये आयुष्य जगायला तर बँग ऑन केलंच पाहिजे, असं नाही जाऊ शकत. त्याचा अनुभव सांगत प्राजक्ता म्हणाली की, डेंजर डेंजर ब्रेकअप्स पाहिलेत मी माझ्या आयुष्यात, एक कोट आहे जे मला खूप आवडतं, ते म्हणजे Strong Souls Choose the hardest life. त्यामुळे तशा पद्धतीने काही स्ट्रगल मी ओढवून घेतले.”
“माझा पुणे-मुंबई स्ट्रगल खूप मोठा होता. फॅमिली सपोर्ट होता पण मेंटली होता पण, ते सत्यात उतरवताना मनुष्यबळ नव्हतं. आजही मुंबईत माझं कोणी नातेवाईक राहात नाही, इमोशनल, मेंटल, आर्थिक स्ट्रगल. खूप धक्के, टोमणे, पाणउतारा, अपमान, ग्रुपिझम, कास्टिझम सगळं काही होतं आणि त्यातून मी घडत गेले. जुळून येती रेशीमगाठीनंतर मी जागेवर आले, त्यानंतर मी कात टाकली. म्हणजे मेघना, जशी जशी फुलत गेली, तशी तशी मी होत गेले. त्या भूमिकांनीही मला खूप शिकवलं.” असं प्राजक्ताने सांगितलं.
पुणे-मुंबई प्रवासाबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, “सुरुवातीला मी डान्स शोमध्ये परफॉर्म केलंय. तेव्हा मी पुणे-मुंबई प्रवास केला. त्यानंतर मी गुड मॉर्निंग होस्ट केलं, तेव्हा सकाळी मी पहाटे चारला उठायचे, तिथून सायनला जायचे. दिवसभर सात एपिसोडचं शूट करायचे, संपवायचे. तिथून चेंबूरवरून बस पकडायचे आणि पुन्हा पुण्याला जायचे. त्या शोमधून मिळालेल्या पैशातून माझं पुढचं शिक्षण झालंय.”