मुंबई प्रतिनिधी :
१६ जानेवारी २०२६ :
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने गोदरेज अॅग्रोवेट लिमिटेडसोबत कापूस शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे. “चांगल्या कृषी पद्धती (GAP) आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM)” या उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रमुख कापूस उत्पादक १६ जिल्ह्यांतील १०० गावांमधील सुमारे ८,००० कापूस शेतकरी कुटुंबांना प्रत्यक्ष प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या उपक्रमामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश कापूस शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे, पीक उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न शाश्वतपणे वाढवणे हा आहे. बीज प्रक्रिया, तण नियंत्रण, कीड व रोग व्यवस्थापन, संतुलित खत वापर, सिंचन व्यवस्थापन आणि पीक संरक्षण याबाबत शास्त्रशुद्ध व सुरक्षित पद्धतींचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तण व्यवस्थापनाच्या अभावामुळे कापूस पिकात होणारे ३० ते ५० टक्क्यांपर्यंतचे आर्थिक नुकसान कमी करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा कृषी कार्यालये, आत्मा (ATMA), कृषी विज्ञान केंद्रे (KVKs) तसेच महिला स्वयं-सहायता बचत गटांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना विविध शासकीय सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असून हजारो कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ही भागीदारी कापूस शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि शाश्वत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. कृषी मंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवण्याचा शासनाचा संकल्प अधोरेखित केला.
महाराष्ट्रातील कापूस शेतीसाठी हा उपक्रम दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



