पुणे प्रतिनिधी :
दि. २० जानेवारी २०२६
राज्यातील राजकारण सध्या वेगाने बदलत असून महापालिका निवडणुकांनंतर सत्तासमीकरणांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. महापौरपदासाठी सुरू असलेल्या चुरशीच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी थेट पुण्यातील आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भाजप हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. अनेक महापालिकांवर भाजपाने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्याचे चित्र होते. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांनी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले.
या दोन महापालिकांमध्ये अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटापासून वेगळी भूमिका घेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले. भाजप आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र रंगले, तर पुण्यात भाजप मंत्री मुरलीधर मोहोळ आणि अजित पवार यांच्यातील मतभेदही उघडपणे समोर आले. युतीचा धर्म पाळण्याच्या घोषणा दिल्या गेल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्याचे प्रतिबिंब फारसे दिसले नाही.
या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. विशेषतः पुण्यात पक्षाला मोठा फटका बसला असून पुणेकरांनी दादांना स्पष्टपणे नाकारल्याचे निकालातून दिसून आले. पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपानेच मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व कायम ठेवले. २०१७ सालीही भाजपाची येथे सत्ता होती आणि त्या वेळी राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपात दाखल झाले होते.
या पार्श्वभूमीवर अजित पवार सध्या पुण्यात मुक्काम ठोकून असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येऊन जिल्हा परिषद निवडणुका लढवणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दरम्यान, पुणे महापालिकेत निवडून आलेल्या आपल्या नगरसेवकांना अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत मार्गदर्शन केले आहे. पुणेकरांनी आपल्याला विरोधात बसण्याचा कौल दिला असून, त्या भूमिकेतूनच प्रभावी कामगिरी दाखवण्याची जबाबदारी आता नगरसेवकांवर आहे, असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या कामकाजाचा सखोल अभ्यास करावा आणि पुणेकरांचे प्रश्न, अपेक्षा व भूमिका ठामपणे सभागृहात मांडाव्यात, असा कानमंत्र अजित पवार यांनी दिला आहे.



