मुंबई प्रतिनिधी :
दि. २१ जानेवारी २०२६
राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडले तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी युतीत निवडणुका लढवल्या, तर अजित पवार यांनी भाजपची साथ सोडून शरद पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फटका अजित पवार गटाला बसला असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा पराभव स्वीकारावा लागला.
स्थानिक समीकरणांनुसार अनेक पक्षांनी स्वतंत्रपणे किंवा युतीत निवडणूक लढवण्याचे निर्णय घेतले. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मुंब्रात मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसून आले. आतापर्यंत मुंब्रावर आव्हाडांचे वर्चस्व राहिले असताना, यावेळी ते आव्हानात सापडले.
मुंब्रात अनेक वर्षांपासून जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाची मजबूत पकड होती. मात्र यावेळी महापालिका निवडणुकीत एमआयएमने जोरदार प्रवेश करत राजकीय समीकरणे बदलून टाकली. एमआयएमकडून थेट निवडणूक लढवत नगरसेविका झालेल्या तरुण नेत्या सहर शेख यांनी आव्हाड यांच्या नेतृत्वालाच थेट आव्हान दिले असून, त्यांच्या वक्तव्यांमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी म्हटले की, “एमआयएमचा पतंग हिरव्या रंगाचा आहे आणि संपूर्ण मुंब्राचा रंग मला हिरवा करायचा आहे.” या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात एमआयएमने मोठी मजल मारली असून, “एमआयएमच्या पतंगामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला,” असेही त्या म्हणाल्या.
सहर शेख यांनी उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, त्यांच्या वडिलांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र त्याऐवजी आधी स्वतःचे नाव जाहीर करण्यात आले. मुंब्रात सर्वात मोठी रॅली काढूनही पक्षाकडून एबी फॉर्म मिळत नव्हता. शेवटपर्यंत जितेंद्र आव्हाड उमेदवारी देण्याचे आश्वासन देत होते, पण अखेर त्यांनी माघार घेतली, असा आरोपही त्यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या, “जर आम्ही जितेंद्र आव्हाडांना आव्हान दिले नसते, तर ते चुकीचे ठरले असते आणि अल्लाहला काय उत्तर दिले असते? शेवटच्या क्षणी माझ्यासमोर अजित पवार गटाचा एबी फॉर्म आणि एमआयएमचा एबी फॉर्म होता. मात्र अजित पवार गट भाजपासोबत असल्याने तो नाकारत, अल्लाहचा संदेश मानून मी एमआयएमचा एबी फॉर्म स्वीकारला.”



