पुणे प्रतिनिधी :
दि. २९ जानेवारी २०२६
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या दुर्घटनेभोवती अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अपघाताआधी वैमानिकाने ‘मे डे’ कॉल दिला होता, यामुळे विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का, तसेच लँडिंगदरम्यान योग्य निर्णय घेतले गेले का, याबाबत आता हवाई वाहतूक तज्ज्ञांनी संशय व्यक्त केला आहे.
सकाळच्या वेळेत पूर्वेकडून येणाऱ्या तीव्र सूर्यकिरणांचा त्रास वाहनचालकांप्रमाणेच वैमानिकांनाही होतो. अशा परिस्थितीत पूर्वेकडे तोंड करून लँडिंग करण्याऐवजी पश्चिमेकडून लँडिंग करण्याचा पर्याय का वापरण्यात आला नाही, तसेच त्या वेळी वाऱ्याची दिशा काय होती, हे मुद्दे तपासात अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हवाई वाहतूक तज्ज्ञ विंग कमांडर (निवृत्त) शशिकांत कोप्पीकर यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, “विमान उतरवताना वारा नेहमी विमानाच्या नाकावर असावा लागतो, शेपटीकडे नसावा. अपघाताआधी वैमानिकाने ‘मे डे’ कॉल दिला, याचा अर्थ काहीतरी गंभीर बिघाड झाला असण्याची शक्यता आहे. लँडिंगच्या वेळी विमान जवळपास ९० टक्के एका बाजूला झुकलेले होते. अशा स्थितीत विमानाची हवेत स्थिर राहण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते. वैमानिकाने असा निर्णय का घेतला, याचा तपास होणे गरजेचे आहे.”
तसेच पहिल्या प्रयत्नात विमानाने ‘गो-अराउंड’ घेतल्यानंतर दुसऱ्यांदा गिरकी न घेता थेट लँडिंगचा प्रयत्न का करण्यात आला, आणि ‘मे डे’ कॉल व त्या निर्णयाचा काही संबंध आहे का, याचाही तपास होणे आवश्यक असल्याचे कोप्पीकर यांनी स्पष्ट केले. एटीसी आणि वैमानिक यांच्यात नेमका कोणता संवाद झाला, याची नोंद तपासात निर्णायक ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बारामती परिसरात केवळ तीन किलोमीटर इतकीच दृश्यमानता असतानाही विमान उतरवण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न आता नागरिकांकडूनही विचारला जात आहे.
विशेष म्हणजे बारामती विमानतळावर शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे ही धावपट्टी उतरण्यासाठी अधिक अवघड आहे का, आणि १५ हजार तासांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या वैमानिकांनाही येथे लँडिंग करताना अडचणी येतात का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
वैमानिकांच्या माहितीनुसार बारामती विमानतळ हे ‘अनकंट्रोल्ड एअरफिल्ड’ आहे. येथे विमाने इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रूल्स (IFR) किंवा व्हिज्युअल फ्लाइट रूल्स (VFR)नुसार उड्डाण करतात. मात्र या नियमांनुसार बारामती विमानतळावरील तीन किलोमीटरची दृश्यमानता ही निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचे वैमानिकांचे म्हणणे आहे.
तज्ज्ञांनी याकडेही लक्ष वेधले की, ज्या विमानतळांवर अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे, तेथे ५५० मीटर इतकी दृश्यमानताही लँडिंगसाठी पुरेशी ठरते. मात्र बारामती विमानतळावर अद्ययावत यंत्रणा नसल्यामुळे अशा कमी दृश्यमानतेत लँडिंग करणे अपेक्षित नव्हते.
अपघातापूर्वी एटीसीने वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसत आहे का, अशी विचारणा केली असता वैमानिकाने नकारात्मक उत्तर दिले. त्यानंतर विमानाने हवेत गिरकी घेतली. दुसऱ्या प्रयत्नात एटीसीने पुन्हा तोच प्रश्न विचारला असता वैमानिकाने यावेळी होकार दिला. त्यानंतर एटीसीकडून लँडिंगची परवानगी देण्यात आली आणि काही क्षणांतच हा भीषण अपघात घडला.
दरम्यान, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री के. राम मोहन नायडू यांनी या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्ही या अपघातासंदर्भात सर्व तपशील गोळा करत आहोत. चौकशी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने केली जाईल आणि कोणतीही बाब दडपली जाणार नाही.”
या दुर्घटनेमागील नेमकी कारणे काय होती, मानवी चूक होती की तांत्रिक बिघाड, की प्रतिकूल हवामान, याचा उलगडा आता चौकशीनंतरच होणार आहे. मात्र तोपर्यंत अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रात शोककळा कायम आहे.





