मुंबई प्रतिनिधी :
दि. १७ फेब्रुवारी २०२६
मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात झालेल्या कथित लाचखोरी प्रकरणामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत संपूर्ण कारवाईबाबत शंका व्यक्त केली. एसीबीच्या कारवाईनंतर नेमकी तक्रार कुणी केली आणि ही माहिती कुणाकडून मिळाली, याबाबत त्यांनी स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री हे मंत्रालयाचे प्रमुख असून एसीबी आपले अहवाल त्यांनाच सादर करते. अशा परिस्थितीत स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कार्यालयावर कारवाई होणे धक्कादायक नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “ही तक्रार नेमकी कुणी केली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट उत्तर द्यावे,” असे त्या म्हणाल्या.
कुणीतरी ‘टिप ऑफ’ दिल्याशिवाय अशी कारवाई होऊ शकत नाही. मंत्रालयातच, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्या मंत्र्यांच्या कार्यालयावर छापा पडणे म्हणजे आपणच आपल्या सहकाऱ्यावर कारवाई करत आहोत, असे चित्र दिसते, असे त्या म्हणाल्या. मात्र या प्रकरणात तथ्य काय आहे याची अधिकृत माहिती नसल्याने ठोस भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर व्यक्ती संपूर्ण राज्याचे नेतृत्व करते, पक्षाचे नाही. मंत्री हा पक्षाचा नसून मंत्रिमंडळाचा सदस्य असतो, असे सांगत कार्यालय सील करण्यामागील प्रक्रियेबाबत त्यांनी पारदर्शकता आवश्यक असल्याचे नमूद केले.
झिरवळ यांच्याबाबत अजित पवार यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे याबद्दल आपण सांगू शकत नसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना समज दिली का, याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. झिरवळ यांना आपण दीर्घकाळापासून ओळखत असल्याचे सांगत आरोपांची पारदर्शक चौकशी व्हावी आणि सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.
पूर्वी छगन भुजबळ आणि नवाब मलिक अडचणीत असताना आपण त्यांच्यासोबत उभे राहिलो होतो, तसेच सहकाऱ्यांच्या सुख-दुःखात सोबत राहणे हीच आपली भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.







