मुंबई प्रतिनिधी :
दि. १७ फेब्रुवारी २०२६
अलिबाग येथे मालमत्तेच्या मोजणीवरून वाद झाल्याचा आरोप होत असताना विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचे नाव चर्चेत आले आहे. रमेश पाटील यांच्या जागेत प्रवेश केल्याने हा वाद उद्भवल्याचेही म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत नार्वेकर यांना लक्ष्य केले होते.
त्या व्हिडिओसोबत “विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी नेमकी कुठे आणि का झाली? राहुल नार्वेकर पळ काढताना दिसत आहेत — तुम्ही सांगणार का मी सांगू?” असा सवाल करत त्यांनी टोला लगावला होता.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे केवळ कल्पनारंजन असल्याचे म्हटले. संजय राऊत यांच्या वक्तव्यांकडे आपण यापूर्वीही दुर्लक्ष केले असून पुढेही त्यावर भाष्य करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अलिबाग हे आपले मूळ गाव असून तेथे शेती आणि जमीन आहे. त्या दिवशी आपण शेती पाहण्यासाठी गेलो असताना दोन व्यक्तींमध्ये वाद आणि मारामारी सुरू असल्याचे दिसले. परिस्थिती शांत करण्यासाठी आपण पुढे गेलो, त्या जागेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय लाभासाठी बिनबुडाचे आरोप करण्याची राऊत यांची जुनी पद्धत असल्याचा आरोप करत त्यांनी, “त्यांच्याकडे व्हिडिओ असल्यास सार्वजनिक करावेत, आम्ही योग्य उत्तर देऊ,” असे म्हटले. नार्वेकर कुटुंबाचे अलिबागमध्ये दीडशे वर्षांपासून वास्तव्य असल्याचे सांगत खोट्या अफवा पसरवण्याची सवय काही लोकांना आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी उपरोधिक टोला लगावत, जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात कारावास भोगून आलेले संजय राऊत लोकांना काय शिकवणार? ते जेलची हवा विसरलेले दिसतात, असे म्हणत त्यांनी राऊतांवर जोरदार टीका केली.







