मुंबई प्रतिनिधी :
दि. 25 जून 2022
महाराष्ट्रात शिवसेना स्थापनेपासूनच्या 56 वर्षांमधल्या सगळ्यात मोठ्या पेचप्रसंगाला तोंड देते आहे. जवळ जवळ 38 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेकडे आता फक्त 16 ते 17 आमदारच उरले आहेत. यादरम्यान एकीकडे मुंबई येथे शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक तर गुवाहाटी येथे शिंदेंचे समर्थन करणार्या बंडखोर आमदारांची व्यूहरचना असा दुहेरी खेळ रंगला आहे.
बाळासाहेबांच्या नावाचा वापर करण्यावर शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. काल व्हर्च्युअल मीटिंग घेतलेले मा. उद्धव ठाकरे आज स्वतः तडकाफडकी दुसरी बैठक घेऊन तिला प्रत्यक्ष हजर राहिले. त्यात त्यांनी हिम्मत असेल तर बंडखोरांनी स्वतःच्या वडिलांचं नाव वापरावं असं म्हटल्याचं समजतं.
या बैठकीत एकूण पाच मुद्यांवर चर्चा झाली आणि त्यातून तीन मुद्द्यांवर एकमत झाल्याचं समजतं. ते तीन मुद्दे असे –
सगळे निर्णय हे मा. उद्धव ठाकरे घेतील. त्यांचा निर्णय अंतिम राहील.
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कुणालाही वापरता येणार नाही.
कोणत्याही कारवाईचा अधिकार हा मा. उद्धव ठाकरे यांच्याकडे असेल.
यापुढे असंही समजतं की स्वर्गीय बाळासाहेबांचं नाव वापरण्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी शिवसेनेने आता निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळेच ‘सरकार कुणाचं’ चा वाद आता ‘बाळासाहेब कुणाचे’ वर येऊन पोहोचल्याची चर्चा सर्वत्र रंगल्याचे दिसते.