मुंबई प्रतिनिधी :
दि. 28 जून 2022
बंडखोर आमदारांची समजूत घालण्यासाठी शिवसेनेने आता नवे अस्त्र बाहेर काढल्याचे समजते. मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे आता या कामी मैदानात उतरल्याचे सूत्रांकडून समजते आहे. रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून त्यांना आपल्या पतीबरोबर बोलावे असे सुचवले आहे.
महाराष्ट्रात शिवसेना बंडखोरीला तोंड देते आहे. आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या भविष्यावर संकटाचे काळे ढग जमल्याचे चित्र आहे. एका बाजूला शिवसेना ‘त्या’ आमदारांविरुद्ध कठोर कारवाईची तयारी करताना दिसून येते आहे तर दुसरीकडे त्यांचे मन वळवण्याचाही प्रयत्न चालल्याचे दिसून येत आहे. आमदारांना समजावण्यात मुख्यमंत्रीही अपयशी ठरल्याचे दिसते आहे. आता या राजकीय लढाईत सौ. रश्मी ठाकरे याही सामील झाल्याचे सूत्रांकडून समजते. असं समजलं आहे की रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन लावून त्यांच्याशी बोलणी केली आहेत.
दुसर्या बाजूला मा. उद्धव ठाकरे हेही मेसेजिंगद्वारे काही आमदारांच्या संपर्कात असून त्यातील काही आमदारांनी आपण शिवसेनेतच असल्याचं सांगितलं आहे असं समजतं. बंडखोर आमदारांकडून आपण शिवसेनेच्या बाजूनं असल्याचं सूतोवाच वारंवार झालंय असंही ऐकिवात आहे. त्यामुळे गोंधळाची परीस्थिती निर्माण झाली आहे. मा. उद्धव ठाकरे यांनी जे आमदार गुवाहाटीहून परत येतील त्यांना सामावून घेण्याची शाश्वती दिली होती आणि ते काहींच्या संपर्कात असल्याचंही ऐकिवात आहे.
शिवसेनेच्या आतल्या गोटातून आमदारांना समजावण्याचे प्रयत्न चाललेले असताना दुसरीकडे पार्टी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कट्टर समर्थकांविरोधात अतिशय कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. एक दिवसापूर्वीच शिवसेनेच्या अर्जानुसार डेप्युटी स्पीकर यांनी 16 आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा बाजवल्या होत्या.