मुंबई प्रतिनिधी :
दि. 30 जून 2022
सुप्रीम कोर्टाने आज ‘विश्वासदर्शक’ ठरावाचा आदेश दिला होता. त्यात काय होणार ही उत्सुकता ताणली गेलेली असतानाच मा. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन सगळ्या शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. वेगवेगळे अंदाज बंधणार्या सगळ्या चर्चा संपल्या आहेत.
याचबरोबर एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरांच्या भूमिकेत आता काय बदल होणार हे महत्त्वाचे दिसत आहे. सरकार भाजपा बनवणार आणि मा. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होणार हे आता जवळ जवळ निश्चित झाले आहे. या दरम्यानच सूत्रांकडून एक विशेष माहिती समजते आहे जी पूर्णपणे अशक्यही वाटत नाही. या सूत्रांचे म्हणणे आहे की नव्या मंत्रीमंडळात आदित्य ठाकरे यांनाही मंत्रिपद दिले जाऊ शकते.
मा. उद्धवजींनी राजीनामा दिल्यामुळे एक प्रकारे तणावपूर्ण वातावरण, मतभेद आणि गैरसमजांना तसेच रूसव्या फुगव्यांना पूर्णविराम मिळाला आहे. कल्पनाच करायची झाली तर बंडखोरी वगैरे प्रकरणे झाली आणि विरली, आता शिवसेना एकजुटीनेच उभी आहे असे चित्र डोळ्यापुढे निर्माण होऊ शकते असे बर्याच जणांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर श्री. आदित्य ठाकरे यांची नव्या मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वादच जर संपलाय आणि या ना त्या प्रकारे महाविकास आघाडीचे सरकार जर गेले आहे तर नव्या सरकारमध्ये पूर्वीच्या सलोख्याला उजाळा मिळण्याचीसुद्धा शक्यता नाकारता येत नाही.